आपल्याकडे टिळकांच्या काळापासून किंवा प्रिंटिंग आल्यापासून दादागिरीचं माध्यम म्हणून वर्तमानपत्रं वावरतायत. आणि वर्तमानपत्र हा एक प्रकारचा माफिया बनतो शेवटी. आणि त्यांचा विरोध करणं आवश्यक आहे. नाही तर आपल्याला सांस्कृतिक जीवन कठीण जाईल...
मी मध्यप्रदेशात असतानासुद्धा अनेक वाद माझ्याभोवती निर्माण करण्यात आले. म्हणजे काही लोकांनी मुद्दाम केले. नंतर मी केलेल्या स्टेटमेंटसची हिंदी वृत्तपत्रांनी दखल घ्यायला सुरुवात केली होती. मी 'वागर्थ'चा डायरेक्टर असताना, उदाहरणार्थ प्रख्यात हिंदी कवी रघुवीर सहाय यांनी 'चित्रेजी को एतराज' असं हेडिंग असलेलं संपादकीय लिहिलेलं आहे. ते कशाविषयी, तर मी भोपाळमध्ये असं भाषणात बोललो की, वर्तमानपत्रात इतक्या संस्कृत्या आहेत की कवितेविषयीची, साहित्याविषयीची किंवा कलेविषयीची बातमी त्यात क्वचितच येते. वस्तुतः ही क्षेत्रसुद्धा तुमच्या फ्रंटपेजवर असली पाहिजेत. त्यांनासुद्धा हेडलाईन्स द्यायला पाहिजेत. पण ह्या मूल्यव्यवस्थेमध्ये हा बत्तीस नंबरचा आयटेम आहे असं तुम्ही ट्रीट करताय त्याला. तर हे बरोबर नाही. आता हे रघुवीर सहाय खोचक शैलीमध्ये आणि चांगलं लिहायचे. तर रघुवीर सहायनी ह्याला हेडलाईन दिली, की 'चित्रेजी को एतराज'. त्यांच्या लक्षात आलं नाही की, हे कॉंट्रॅडिक्ट केलंय त्यांनी. त्या अग्रलेखामुळे माझं म्हणणं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं, की 'चित्रेजींना याचा राग येतो, पण मी जर्नालिस्ट म्हणूनही काम करतो आणि जर्नालिस्टला इतर ठिकाणी लक्ष द्यावं लागत असतं. अमुकतमुकचा चित्रेजींना राग का यावा? आणि कवींना का हेडलाईन्सचा सोस असावा?' तर मला कोणीतरी म्हणालं की, 'आता काय याचं?' मी म्हटलं, 'ठीक आहे. रघुवीर सहायनी माझं म्हणणं मान्य केलं आहे. 'चित्रेजी को एतराज' या हेडिंगनेच जर का अग्रलेख आला तर आणखी काय पाहिजे?'
...नंतर एक विडंबनासारखा किंवा विनोदी टाईपचा एक लेख आहे. भोपाळच्या एका मॅगॅझिनमधला. त्याच्यात भारत भवनची नालस्ती केलेली आहे. दुसरा आणखी वाद म्हणजे मी काय म्हटलंय हे गृहीत धरून - म्हणजे करंदीकर, बापट आणि पाडगावकर सर्कस वगैरेच्या लेव्हलला... मग तो वाद त्यांनी निर्माण केला. त्यातसुद्धा मी भाग घेतला नाही. कारण मूळचं माझं म्हणणं जर का विपर्यस्त रूपात मांडलेलं असेल तर काय? पण मी म्हटलं, जर्नालिझमची मूलभूत जबाबदारी आपण पाळत नाही. टिकेकरला - इथं तो इंटरनॅशनल बुक हाऊसमध्ये भेटला तेव्हा हटकलं - सगळ्यांना ऐकू जाईलसं - 'टिकेकर, तुम्ही हलकट संपादकीय लिहायचं कधी थांबवणार?' कारण अरुण कोलटकर हे उनाडक्या करत हिंडत असतात वगैरे, असं त्याने अग्रलेखात लिहिलं होतं. काही संदर्भ नसताना. 'ह्यांचे मित्र अरूण कोलटकर म्हणून.' आता कॉमनवेल्थ ऍवॉर्ड मिळालेला मनुष्य, तुला त्याची किंमत कळत नसेल, उनाडक्या करत हिंडत असतो म्हणजे? आणि साडेतीन लाख किंवा तीन लाख वाचकांना अरुण कोलटकर माहित नसताना त्याची एक विकृत प्रतिमा तयार करून त्यांच्याकडे तुम्ही देणार. त्यातल्या वाचकांपैकी फक्त शंभर-दोनशे त्याला ओळखत असतील. तर मी म्हटलं, ही गुंडगिरी आहे. टेररिझम आहे हा एक प्रकारचा. दादागिरी आहे. आणि ह्या दादागिरीची सुरुवात लोकमान्य टिळकांनीच केली होती. ही मराठी जर्नालिझमची परंपरा आहे. त्यात आपण जाऊन बसलो. पण हे अशा त-हेचं आपल्याकडे झालेलं आहे. एक लोकांना माहीत नाही की ज्या वेळेला जोतिबा फुले वारले त्या वेळेला ती बातमी पण नाही आली किंवा त्यांच्यावरती एखादा अग्रलेख सुधारक मध्ये आला नाही. आगरकरांनी त्यांची दखलसुद्धा घेतली नाही. आता आगरकरांबद्दल विचार करणा-या सगळ्या लोकांनी ह्याचं आपल्याला एक्स्प्लनेशन द्यावं. आपल्याकडे जर्नालिझमचे असे उपयोग पहिल्यापासून झालेले आहेत....
(संदर्भ - कवितेबाहेरचा कवी - दि. पु. चित्रे यांची मुलाखत - प्रदीप कर्णिक, समकालिन संस्कृती, दिवाळी ९६, पा. १७१, १७३-७४)